मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येणार्या काळात संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर दिला पाहिजे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत केले.
दादर येथील वसंतस्मृती येथे चार जून २०१८ रोजी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे, भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक व सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते.
दिवसभर सुरू असलेल्या बैठकीत सायंकाळच्या सत्रात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ‘केंद्रातील सरकारची चार वर्ष पूर्ण झाली आहेत. पुढचे एक वर्ष हे आता निवडणुकीच्या तयारीचे वर्ष आहे. या एका वर्षांत आपल्याला सरकारचे काम घेऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकदा युद्धाच्या तयारीबाबतचे पत्र लिहिले होते. ते पत्र प्रत्येकाने वाचावे असेच आहे. युद्धासाठी काय-काय तयारी करावी लागते, याचे अतिशय बारकाईने विश्लेषण त्यांनी त्यात केले आहे. सूक्ष्म नियोजन हा त्या पत्राचा गाभा आहे. पणतीसाठी लागणार्या वातीचाही त्यात उल्लेख आहे. सूक्ष्म नियोजनासोबतच थेट संवाद हा तितकाच महत्त्वाचा आहे. संवादाच्या प्रत्येक माध्यमांमध्ये माणसाचा माणसाशी थेट संवाद हा सर्वोत्तम मार्ग आहे.’
‘आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध सारे पक्ष अशी स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे विचलित होण्याची गरज नाही; पण आपण आपली तयारी पूर्ण ठेवली पाहिजे. सर्व पक्ष एकत्र येणार असतील, तर आणखी ताकदीने आपल्याला रिंगणात उतरावे लागेल आणि त्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे. बुथ पातळीवरील संघटन मजबूत करा, सरकारच्या योजनांचा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि प्रत्येक नागरिकासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. संवाद आणि संपर्क यातूनच आणखी मोठे यश येणार्या काळात आपण संपादित करू,’ अशा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.
‘पोटनिवडणुकीत अपयश आले, तर त्याची बातमी होते; पण, यश मिळाले ते पुढे येत नाही. कर्नाटकात आपण सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आलो, यापेक्षा कुठे एक जागा गमावली याचीच चर्चा अधिक होते. त्यातून एक नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्यावर थेट संपर्क आणि थेट संवाद हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या थेट संवादासाठी स्वत:ला सज्ज करावे,’ असे आवाहन फडणवीसांनी केले.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.